अमिताभ बिझनेसमध्येपण ‘बच्चन’च!

अमिताभ बच्चन ये नाम ही काफी है। अमितजी हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनावर राज्य करतात. खरं तर त्यांच्याविषयी लिहणे याही पेक्षा त्यांचा प्रवास समजून घेणे जास्त गरजेचे वाटते.

हरिवंश राय बच्चन यांच्या एका कवितेच्या ओळी आहेत, तुफानो से डर के नौका पार नही होती। कोशीश करणे वालो की कभी हार नही होती। वडिलांच्या या कवितेतील प्रत्येक शब्द आपल्या जगण्यात उतरवणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या आज 80 वर्षाचा जीवनप्रवास खूप काही शिकवणारा आहे.

चित्रपट क्षेत्रात सुपरस्टार म्हणून काही दशक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या कलाकाराने प्रसिद्धी, पैसा, ऐशोआराम, मिळवला तसाच अनेक कठीण प्रसंगाना ही सामोरा गेला. आजारपण, अपघात आणि व्यावसायिक असफलता, कर्जबाजारीपणा यातून स्वतःला बाहेर काढले.

अमिताभ बच्चन यांची एबीसीएल (Amitabh Bachchan Corporation Ltd). ही कंपनी बुडाली हे आपल्याला ठाऊक असेलच. पण यातून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा उभारी घेतली या महानायकाने.

जेव्हा एबीसीएल कंपनीची स्थापना करण्यात आली तेव्हा सुरुवातीला या कंपनीला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. मग अमिताभ बच्चन यांनी या व्यवसायावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले.

१९९६ साली होणाऱ्या मिस वर्ल्ड कंपनीच्या कामाचे कॉन्ट्रॅक्ट एबीसीएलला देण्यात आले. भारतातील बंगलोर शहरात चार महिन्यांमध्ये या स्पर्ध्येचे आयोजन करून तो यशस्वी करण्याचे आव्हान एबीसीएल कंपनीने स्वीकारले. प्रथमच असा सोहळा आपल्या देशात आयोजित केला जात होता.

अशा वेळी अपेक्षित खर्चापेक्षा जास्त खर्च झाला. त्याकाळी भारतात अशा स्पर्धाना खास असा प्रेक्षकवर्ग नव्हता. त्यामुळे या कार्यक्रमाची तिकीट विक्री करण्यात कंपनी अयशस्वी ठरली. त्यामुळे एबीसीएल कंपनीला मोठ्या तोट्याला सामोरे जावे लागले.

एबीसीएल कंपनी डबघाईला आली आणि त्यामुळे अमिताभ बच्चन कर्जबाजारी झाले होते. पण अमिताभ बच्चन यांनी हार मानली नाही. कोणताही कमीपणा वाटून न घेता आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी छोट्या पडद्यावर काम करायचे ठरवले.

‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर त्यांची दिमाखात एंट्री झाली आणि या कार्यक्रमाने इतिहास रचला. अमिताभ बच्चन यांची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली.

निर्माते यश चोप्रा यांच्या मोहब्बते चित्रपटाने तर त्यांचे दिवसच पालटून टाकले. या चित्रपटाच्या यशाने, आणि कौन बनेगा करोडपतीच्या यशाने “बच्चन यांची जादू अजूनही कायम आहे” हा संदेश चित्रपटसृष्टीला मिळाला.

अमिताभ बच्चन यांनी एबीसीएल कंपनीची सर्व कर्जे फेडून टाकली आणि गमावलेला विश्वास आणि स्टेटस दोन्हीही परत मिळवले. अभिनय क्षेत्रात खूप मोठं नाव आणि प्रचंड यश मिळवलेल्या अमिताभ बच्चन यांना व्यवसायात मात्र अपयशच आले. परंतु, या अपयशावरही त्यांनी मात केली.

– प्रतिभा राजपूत

The post अमिताभ बिझनेसमध्येपण ‘बच्चन’च! appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment