आसाममधून पुण्यात आलेली अकलीमा झाली उद्योजिका

आसामसारख्या पूर्वोत्तर राज्यातून पुण्यात आलेली अकलीमा प्रथम नवर्‍यासोबत सैन्य छावणीत राहते. तिथेच छंद म्हणून शिकलेले कौशल्य पुढे तिला उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडतं. आज एकटी आई असली तरी आपल्या दोन मुलींना चांगल्या दर्जाचे शिक्षण ती देते आहे. मनापासून पुणेकर झालेली अकलीमाची ही कथा आपल्याला सहज तिच्याशी जोडतं.

लग्नानंतर सैन्यात असलेल्या आपल्या पतीसोबत पुण्याच्या आर्मी कॅम्पमध्ये आलेली अकलीमा खातून आज पुण्यात स्वत:च्या बळावर व्यवसाय करून स्वतंत्र राहत आहे. २००४ साली लग्न करून ती पुण्यात आली. पण तिथला रिकामेपणा तिला स्वस्थ बसू देत नव्हता.

कॅम्पमध्ये सैनिकांच्या कुटुंबियांसाठी वेगवेगळ्या स्किल्सचे काही कोर्सेस घेतले जातात. अकलीमा इथे ब्युटी पार्लर शिकली. अकलीमा नुसतं शिकूनच थांबली नाही तर तिथल्या अधिकार्‍यांच्या घरातील महिलांना ती होम सर्विस देऊ लागली. इथूनच तिचा उद्योजकीय प्रवास सुरू झाला.

दुर्दैवाने तिचा संसारात काडीमोड झाला. दोन मुलींसोबत ती पुण्यात राहू लागली. अशावेळी तिच्या उपयोगी पडले ते तिने घेतलेले सौंदर्य प्रसाधनाचे शिक्षण. २०१८ मध्ये ती ‘अर्बन कंपनी’शी जोडली गेली. अर्बन कंपनीवरून येणार्‍या लीडनुसार घरोघरी जाऊन पार्लरची सेवा देऊ लागली.

हळूहळू अकलीमा पुण्यामध्ये स्थिरस्थावर होऊ लागली. अकलीमाला समाजातील संघर्षरत महिलांसाठी काही करण्याची इच्छा होती. म्हणून तिने कोंडवा भागात ‘शाईन अँड स्माईल’नावाने स्वतःचे ब्युटी पार्लर आणि ब्युटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू केली.

ज्या महिलांचे शिक्षण कमी म्हणून जीवनात खूप संघर्ष आहे अशांना अकलीमा आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सौंदर्य प्रसाधन शिकवते; जेणेकरून त्याही अकलीमाप्रमाणे स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकतील. ज्या महिलांना ब्युटी सेवा खरेदी करणे परवडत नाही अशांसाठी अकलीमाने एक मेंबरशीप कार्ड योजना सुरू केली आहे; ज्याद्वारे या महिला कमी खर्चात या सेवा घेऊ शकतात.

लॉकडाउन काळात महिलांना तिने ऑनलाइन ट्रेनिंग दिलं. तिथपासून ऑफलाईन तसेच ऑनलाइन ट्रेनिंग ती देऊ लागली आहे. महाराष्ट्रभरातून अशा महिलांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्याचा अकलीमा खातूनचा मानस आहे.

अकलीमा आसामची असली तरी ती आता पूर्णपणे पुणेकर झाली आहे. तिच्या दोघी मुली पुण्यातच सीबीएसइच बोर्डाच्या शाळेत शिकत आहेत. महाराष्ट्र आणि पुणेकरांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलं, असं ती अभिमानाने सांगते.

आपण परराज्यातून येऊन इथे व्यवसाय करतो तरी कोणी द्वेषाने पाहत नाही, तर सगळे सहकार्यच करतात असा तिचा महाराष्ट्राबद्दल अनुभव आहे. यामुळेच ती कायमस्वरूपी इथेच वसणार असून आसामला परत जाण्याचा काहीच विचार केलेला नाही.

बाहेर राज्यातून तेही पूर्वोत्तर भारतातील राज्यातून कमी शिकलेली एक महिला इथे यशस्वीरीत्या व्यवसाय करते आहे. आपल्यासोबत इतर महिलांच्या हातालाही रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करते आहे. हे महिला उद्योजकतेच एक चांगलं उदाहरण म्हणता येईल.

संपर्क – 9371922709

The post आसाममधून पुण्यात आलेली अकलीमा झाली उद्योजिका appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment