उडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान

महाराष्ट्र राज्यामध्ये उडीद आणि मुगाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बहुतांश शेतकरी उडीद आणि मुगाची लागवड करतात आणि कमी दिवसांमध्ये येणारं पिकर अशी याची ओळख आहे. तसंच आपल्या आहारामध्ये मुगाच्या डाळीचा समावेश केला जातो. प्रथिनांचा समावेश यामध्ये आहे. तसंच आपण उडदाच्या डाळीचा वापर पापड निर्मितीसाठी करतो. तसेच इतरही मूल्यवर्धित पदार्थ यापासून तयार करता येऊ शकतात.

त्या अनुषंगाने या पिकाची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून आलेली आहे. परंतु आपण जर काढणीपश्चात तंत्रज्ञान व्यवस्थित केले नाही आणि आपल्याकडे काढणीपश्चात तंत्रज्ञानाच नियोजन नसेल तर उत्पादित केलेल्या उडीद आणि मूगसाठी जास्त किंमत आपल्याला येत नाही. त्यासाठी आपण काढणीपश्चात तंत्रज्ञानकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

तसंच उडीद आणि मूग या पासून डाळनिर्मिती करणं ही खूप महत्त्वाची काळाची गरज आहे. त्यामुळे गावातील सर्व शेतकर्‍यांनी उडीद शेतामध्ये पिकल्यानंतर बाजारात न विकता आपण त्यापासून डाळी निर्मिती करून डाळ बाजारात विकणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला जास्त फायदा होऊ शकतो. तसेच गावात डाळ मिल उद्योग जर चालू झाले तर ग्रामीण युवकांना एक चांगला व्यवसाय यामधून निर्माण होऊ शकतो.

काढणी (कापणी) : उडीद आणि मुगाच्या शेंगांमध्ये दाणे भरून ते पक्क झाल्यापासून पिकाची कापणी करेपर्यंतची हवामानाची स्थिती ही उत्पादित होणार्‍या बियाण्याच्या उगवणशक्ती व गुणवत्तेच्यादृष्टीने फार महत्त्वाची असते. पिकाच्या या अवस्थेत शेंगा पक्‍व होत असताना बियांतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असते.

या काळात सतत व दीर्घकाळ पडणारा पाऊस अत्यंत नुकसानकारक असतो. अशा पावसात पीक भिजून पुन्हा वाळते; त्यामुळे बियाण्याच्या उगवणीवर विपरीत परिणाम होती. जर पक्व अवस्थेत पीक असताना पाऊस आला, तर पाऊस थांबल्यानंतर लगेच पिकाची कापणी करावी. मात्र, अशा वेळी कापलेले पीक वाळविण्यासाठी योग्य सुविधा असणे आवश्यक आहे. यामुळे बियाण्याची प्रत चांगली राहण्यास मदत होते; शिवाय शेंगा फुटून उत्पादनात घटदेखील येत नाही.

पिकाची कापणी धारदार विळ्याच्या सहाय्याने जमिनीलगत करावी. कापणी केलेल्या पिकाचे लगेच ढीग लावू नयेत व कापलेले पीक शेतातच उन्हात वाळू द्यावे. ढीग लावल्यास बियाण्याच्या प्रतीवर व उगवणशक्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केलेली असल्यास वेळ व पेंशाची बचत होण्याच्यादृष्टीने कापणी व मळणी ही यंत्राद्वारे (कम्बायन हार्वेस्टर) करणे योग्य ठरते.

कापणी करताना पाते जमिनीच्या वर ८ ते १० सें.मी. राहतील व यंत्राचा वेग मध्यम राहील, याची काळजी घ्यावी. ब्रश कटरचा वापर करूनदेखील उडीद आणि मुगाची कापणी करता येतें व कापणी केलेले उडीद आणि मुग एक किंवा दोन मजुरांद्वारे गोळा केले जाते. या कापणी पद्धतीमुळे वेळ व मजूर यांची बचत होते.

मळणी : मळणी यंत्राने मळणी करताना बियाण्यातील आर्द्रता १४ टक्क्यांपेक्षा कमी नसावी. मळणी यंत्राच्या फेर्‍याची गती प्रति मिनीट ४०० ते ५०० फेरे इतकी ठेवावी. बियाण्यातील आर्द्रतेचे प्रमाण १३ टक्क्यांपर्यंत असेल तर मळणी यंत्राच्या फेर्‍याची गती ३०० ते ४०० फेरे प्रति मिनीट ठेवावी. मळणीवेळी अधूनमधून बियाण्यावर लक्ष ठेवावे. जेणेकरून त्याची डाळ होणार नाही. डाळ होण्याचे प्रमाण जास्त असल्यास वेग कमी करावा.

उडीद आणि मुगाची प्रतवारी करणे : महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच शेतकरी उडीद आणि मुग काढणी केल्यानंतर आहे असे व्यापार्‍यांना विक्री करतात. तर असं न करता आपण प्रतवारी करणे गरजेचे आहे. तसेच उडीद आणि मुग क्लीनर कम ग्रेडर या मशीनचा वापर करून उडीद आणि मुगमधील काडीकचरा, माती, खडे बाजूला काढणे गरजेचे आहे. तसेच मळणी करत असताना काही उडीद आणि मुगचे तुकडे झाले असतील हेदेखील बाजूला काढणे गरजेचे आहे. स्वच्छ केलेल्या उडीद आणि मुगची प्रतवारी करणे गरजेचे आहे.

प्रतवारी करण्यासाठी आपण ग्रेडर कम क्लीनर या मशिनचा वापर करणे आवश्यक आहे. अशा मशीनचा वापर करून शेतकर्‍यांनी प्रतवारी केली आणि स्वच्छ करून त्याची साठवण करून ठेवलं तर निश्चितपणे या उडीद आणि मुगचा दर हा इतर उडीद आणि मुगापेक्षा चांगला मिळू शकतो.

क्लीनर कम ग्रेडर मशीनमधून उडीद आणि मुगमधील काडीकचरा, माती, दगड आणि फुटलेले उडीद आणि मुग हे बाजूला काढले जाते, तसेच प्रतवारी केली जाते आणि अशा उडीद आणि मुगला दर चांगला मिळू शकतो. उडीद आणि मुग आहे अशी बाजारात विक्रीसाठी नेले तर व्यापारी या उडीद आणि मुगला दर कमी देतात आणि प्रतवारी केलेल्या उडीद आणि मुगला निश्चित दर जास्त मिळतो.

हाताळणी व साठवणूक : ताडपत्रीवर एकसारखे पसरवून बियाण्यातील आर्द्रता १०-१२ टक्के काड्या, कचरा, माती, खडे इत्यादी काढून ते स्वच्छ करावे. बियाणे हाताळताना ते जास्त उंचीवरून आपटले जाणार नाही, याची काळजी घ्यावी. स्वच्छ केलेले बियाणे कोरड्या जागेत स्वच्छ, कोडविरहित किंवा नवीन पोत्यात साठवून ठेवावे.

साठवण करायच्या बियाण्याची आद्रता ८-१० टक्के असावी. बियाण्यातील आर्द्रता ६ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास उगवणशक्तीवर परिणाम होतो. बियाणे भरून ठेवण्यासाठी ज्यूटचे पोते वापरावे.

साठवणुकीची जागा कोरडी व ओलावा प्रतिबंधक असावी व उन्हाळ्यात बियाणे साठवण केलेल्या खोलीतील तापमान ४२ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असू नये. बियाणे एक किलोच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास साठवणूक करताना चार पोत्यांमध्ये जास्त व ४० किलोंच्या पोत्यामध्ये भरलेले असल्यास आठ पोत्यांपेक्षा जास्त थप्पी लावू नये.

अन्यथा, सर्वात खालच्या पोत्यातील बियाण्यावर जास्त वजन पडून बियाणे फुटून त्याची उगवणशक्ती कमी होते. पोत्यांची थप्पी जमिनीपासून १०-१५ सें.मी. उंचीवर लाकडी फळ्यांवर लावावी. पोत्यांची रचना उभी-आडव्या पद्धतीने करावी, म्हणजे हवा खेळती राहून बियाण्याची गुणवत्ता व उगवणशक्ती जास्त काळ टिकण्यास मदत होते.

आवश्यकतेनुसार बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये कीटकनाशक व बुरशीनाशकाचा वापर करावा. बियाणे साठवण केलेल्या खोलीमध्ये उंदरांचा उपद्रव होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. उडीद आणि मुगाच्या बियाण्याच्या पोत्यांची हाताळणी व वाहतूक काळजीपूर्वक करावी. पोती उंचावरून आदळली जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये साठवण : उडीद आणि मुग साठवण्यासाठी वखार महामंडळाच्या गोडाउनमध्येदेखील शासनाने सोय करून ठेवलेली आहे. ज्यांच्याकडे उडीद आणि मुग उत्पादन जास्त होणार आहे आणि त्यांना साठवण्यासाठी जागा कमी आहे. अशा शेतकर्‍यांनी महाराष्ट्र शासनाचे वखार महामंडळाची गोडाऊन यामध्ये साठवण करावी.

वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये साठवण केल्यामुळे आपल्याला उडीद आणि मुगच्या तारणावर कर्ज मिळू शकते. उडीद आणि मुगची प्रतवारी करणे तसेच साठवून ठेवणं ही सर्व काळजीही वखार महामंडळाचे असते. त्या दृष्टीने आपण इथून पुढच्या काळामध्ये उडीद आणि मुग साठवण्यासाठी वखार महामंडळाच्या शासकीय गोडाऊनचा वापर करणे आवश्यक आहे. बहुतांश करून व्यापारी या वखार महामंडळाच्या जास्त वापर करतात. परंतु शेतकरी कमी प्रमाणात वापर करत आहेत.

शेतकर्‍यांमध्ये याची जनजागृती होणे आवश्यक आहे, महाराष्ट्र शासनामार्फत वखार महामंडळाच्या शासकीय गोडाऊनमध्ये आपण धान्य साठवून ठेवू शकतो. जेव्हा उडीद आणि मुगाचा दर चांगला असेल त्यावेळेस आपण सोयाबीन वखार महामंडळाच्या गोडाऊनमधून घेऊन बाजारात विक्री केल तरी आपल्याला फायदा होऊ शकतो.

ज्या वेळेस दर बाजारात नसतो त्या वेळेस आपण त्याची साठवण करून ठेवणे गरजेचे आहे. तसेच ज्या शेतकर्‍यांना पैशाची जास्त आवश्यकता असेल त्या शेतकर्‍यांनी वखार महामंडळाच्या शासकीय गोडाऊन मधून उडीद आणि मुग तारण पावती मिळते आणि तारण पावती आपण बँकेत जमा केल्यानंतर बँक आपल्याला कर्ज देते आणि सदर कर्जाचा वापर आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी करावा. ज्या वेळेस बाजारामध्ये सोयाबीनला दर जास्त येईल त्यावेळेस आपण सोयाबीनची विक्री करावी.

मूल्यवर्धन : उडीद आणि मुगाची मूल्यवर्धन हे आवश्यक आहे. कारण उडीद आणि मूग यापासून उत्पादित होणार्‍या डाळीला भरपूर प्रमाणात मागणी आहे. डाळ मिल उद्योग आपल्या गावात निर्माण केला तर निश्चितपणे आपल्या गावात चांगल्या पद्धतीने उद्योजक निर्माण होऊ शकतात. गावातील शेतकर्‍यांना उडीद आणि मुगाची डाळ तयार करण्यासाठीच सहजासहजी यंत्र गावांमध्ये उपलब्ध होऊ शकतात. यासाठी आपण यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत किंवा इतर शासकीय योजनेचा वापर करून डाळ मिल उद्योग गावांमध्ये चालू करावा.

डाळ मिल उद्योगामार्फत आपण उडीद आणि मुगाची डाळ तयार करून त्याचे पॅकेजिंग करून बाजारात विक्री करणे आवश्यक आहे. पॅकेजिंग करत असतानादेखील आपण पाव किलो, अर्धा किलो, एक किलो, दोन किलो अशी छोट्या प्रमाणातदेखील आणि मोठ्या प्रमाणातदेखील पॅकिंग करणे आवश्यक आहे कारण ग्राहकांना जे आवश्यक असेल ते तुमच्याकडून घेऊन जाऊ शकतात.

तसेच डाळ मिल उद्योगांमध्ये निर्माण होणारा उडीद आणि मुगाच्या डाळीचा भुसा असेल किंवा डाळीचे तुकडे असेल याचा वापर आपण पशुखाद्यासाठीदेखील करू शकतो. त्यासाठी आपण पशुखाद्यासाठी विक्रीदेखील चांगल्या पद्धतीने करू शकतो. यामधून आपल्याला अर्थार्जन करण्यासारखं चांगलं साधन आहे.

– डॉ. दादासाहेब खोगरे
विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र,
तडसर ता. कडेगाव जि. सांगली
मोबाईल नंबर: 9370006598

The post उडीद आणि मूग काढणीपश्चात तंत्रज्ञान appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment