१५ ऑगस्टपासून जिल्हा आणि तालुका पातळीवर सुरू आहे ‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा’

महाराष्ट्र सरकारने नवउद्यमी आणि तरुणांमधील संशोधन वृत्ती याला प्रोत्साहन देण्यासाठी १५ ऑगस्ट ‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा’ सुरू झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर कार्यक्रम होत असून. इथे स्टार्टअप्सची निवड आणि त्यांना प्रशिक्षण तसेच आवश्यक ती सरकारी मदत देण्यात येणार आहे.

पुढील तीन महिने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात आणि प्रत्येक तालुक्यात ही यात्रा जाणार आहे. राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाद्वारे महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यात्रेदरम्यान काही प्रोजेक्ट स्टार्टअप कंपन्यामधून निवडले जातील.

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेचे तीन टप्पे :

१) तालुकस्तरीय प्रचार व प्रबोधन : यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना, त्याचे इतर पैलू याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. नावीन्यपूर्ण कल्पना असलेले नागरिक आपल्या कल्पना यावेळी नोंदवू शकतात.

२) जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा : प्रशिक्षण शिबिरात नवउद्योजकतेबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजक व तज्ज्ञ मार्गदर्शक यांची व्याख्याने होणार आहेत. तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांच्या संकल्पनांची सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्ह्यात एकूण ५४ जिल्हास्तरीय सत्रे होणार आहेत. जिल्हास्तरावर सर्वोत्तम कल्पना सादर करणाऱ्‍यांना २५ हजार रुपयांपर्यंतचे पारितोषिक मिळणार आहे.

३) राज्यस्तरीय सादरीकरण स्पर्धा व विजेत्यांची घोषणा : प्रत्येक जिल्हा सादरीकरण सत्रातील उत्तम १० कल्पनांचे (एकूण ५४० कल्पंनाचे) राज्यस्तरीय सादरीकरण तज्ज्ञ समितीसमोर करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय विजेत्यांना एक लाख रुपयांपर्यंतचे रोख अनुदान तसेच आवश्यक पाठबळही पुरवण्यात येतील.

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे.
www.msins.in किंवा www.mahastartupyatra.in

The post १५ ऑगस्टपासून जिल्हा आणि तालुका पातळीवर सुरू आहे ‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा’ appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment