प्रवास एका आयुर्वेदिक डॉक्टरने स्थापन केलेल्या बलाढ्य कंपनीचा…

भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा तो काळ होता. कलकत्ता शहरात हातावर पोट असलेल्या श्रमिकांची संख्या खूपच जास्त होती, आणि ते दाटीवाटीने उभ्या असलेल्या घरांमध्ये रहात असत. रोजंदारीवर काम करत ते आला दिवस ढकलत होते. आतासारखं वैद्यकीय शास्त्र निदान भारतात तरी आधुनिक झालं नव्हतं, त्यामुळे कोणत्या ना कोणत्या रोगाची साथ ही नित्याची बाब झाली होती.

कलकत्ता येथे एक डॉक्टर आपल्या छोट्याशा दवाखान्यात खूप आत्मीयतेने रोगनिवारणाचं काम करत असत. त्याचं नाव डॉ. एस.के. बर्मन. ते आयुर्वेदिक डॉक्टर होते. डॉ. बर्मन यांनी कलकत्त्याच्या गजबजलेल्या भागात एक छोटा दवाखाना उघडला आणि लोकांवर उपचार सुरू केले.

त्यांच्या असं लक्षात आलं की या रोजंदारीवर काम करणार्‍या लोकांना छोट्या-मोठ्या आजारांवर औषध तर द्यायला हवंच होतं, पण त्याचबरोबर मलेरिया, कॉलरा यासारख्या गंभीर आजारांवर त्यांना सहज परवडेल अशा दरात आयुर्वेदिक औषधदेखील देता यायला हवं.

याच उद्देशाने त्यांनी आयुर्वेदिक औषधं बनवायला सुरुवात केली. त्याच वेळी त्यांनी त्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आरोग्यवर्धक उत्पादनेदेखील बनवण्यास सुरुवात केली. डॉ. बर्मन यांना त्या वेळी माहीत नव्हतं, की ते एका बलाढ्य आयुर्वेदिक औषधं बनवणार्‍या कंपनीला जन्म देत आहेत.

‘डाबर’ लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे, ज्याची स्थापना डॉ. एस.के. बर्मन यांनी केली, त्याचे मुख्यालय गाझियाबाद येथे आहे. ही कंपनी आयुर्वेदिक औषधे आणि नैसर्गिक उत्पादने तयार करते. ही भारतातील सर्वात मोठ्या फास्ट-मूव्हिंग कंझ्युमर गुड्स (एफएमसीजी) कंपन्यांपैकी एक आहे. ‘डाबर’ला त्याच्या जवळपास 60 टक्के महसूल ग्राहकसेवा व्यवसायातून, 11 टक्के अन्न व्यवसायातून आणि उर्वरित आंतरराष्ट्रीय व्यवसायातून मिळतो.

‘डाबर’ची स्थापना कोलकाता येथे डॉ. एस.के. बर्मन यांनी 1884 मध्ये केली होती. डॉ. बर्मन यांचे कुटुंब मूळचे पंजाबी खत्री आहेत आणि पंजाबमधून कलकत्ता येथे स्थलांतरित झाले होते.

1880 च्या दशकाच्या मध्यात कलकत्ता येथे आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून त्यांनी कॉलरा, बद्धकोष्ठता आणि मलेरिया यासारख्या रोगांसाठी आयुर्वेदिक औषधे तयार केली. ते एक व्यावसायिक वैद्य होते आणि बंगालमध्ये सायकलवर आपली औषधे विकायला जात असत. कंपनीचे नाव ‘डाबर’ असे पडले हे पाहणे मनोरंजक ठरेल.

डॉ. बर्मन यांचे रुग्ण त्यांचा आणि त्यांनी बनवलेल्या औषधांचा उल्लेख ‘डाबर’ म्हणून करू लागले, जो ग्रामीण भाषेत डागदर (डॉक्टर) आणि बर्मन या दोन शब्दांनी मिळून तयार झाला आहे. नंतर डॉ. बर्मन यांनी आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले.

सी.एल. बर्मन यांनी ‘डाबर’चे पहिले रिसर्च युनिट स्थापन केले. नंतर डाबरच्या कारखान्यातील कामगार संपावर गेले आणि त्यांचा नातू जी.सी. बर्मन यांना कोलकाता येथील कारखान्यात कामगारांनी घेराव घातला. तेरा दिवसांच्या संपामुळे डाबर नेपाळ, डाबर इंडियाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

भारत-नेपाळ सीमेजवळील बारा जिल्ह्यात त्यांनी संप पुकारला. ऑल नेपाळ ट्रेड युनियन फेडरेशन (रिव्होल्यूशनरी), सत्ताधारी माओवादी पक्षाची शक्तिशाली कामगार संघटना यांनी 31 ऑगस्टपासून जास्त बोनसची मागणी करत काम बंद पाडले.

‘डाबर’ने आपल्या कर्मचार्‍यांना कामगार कायद्यानुसार ठरवलेले दहा टक्के बोनस देण्याचे मान्य केले, तरी माओवादी युनियनने व्यवस्थापनावर नफ्याचे आकडे लपवल्याचा आरोप केला. कंपनीला पुन्हा काम सुरू करण्यापूर्वी युनियनशी करार हवा होता.

चिघळलेल्या परिस्थितीमुळे जी.सी. बर्मन यांनी ‘डाबर’चा कारखाना दिल्लीला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यांचे भाऊ नंतर दिल्लीला स्थलांतरित झाले. दिल्लीत व्यवसायाची भरभराट झाली आणि लवकरच कंपनीचे मुख्यालय तेथेच झाले. कलकत्त्याचे नुकसान हा दिल्लीचा फायदा ठरला.

सध्याचे चेअरमन डॉ. आनंद बर्मन आणि व्हाइस चेअरमन अमित बर्मन हे कुटुंबातील पाचव्या पिढीतील आहेत. 1998 मध्ये जेव्हा त्यांनी कंपनीचे व्यवस्थापन व्यावसायिकांकडे सोपवले तेव्हा व्यवस्थापनापासून मालकी वेगळे करणारे ‘डाबर’ हे भारतातील पहिल्या व्यावसायिक कुटुंबांपैकी होते.

‘डाबर’ने 2003 मध्ये त्यांचा फार्मा व्यवसाय डाबर फार्मा लिमिटेड या नावाने डिमर्ज केला. ‘फ्रेसेनियस एस ई’ या जर्मन कंपनीने जून 2008 मध्ये ‘डाबर फार्मा’मधील 73.27 टक्के इक्विटी शेअर 76.50 प्रति शेअर या दराने विकत घेतला. डाबर इंटरनॅशनल डाबर इंडियाची पूर्ण मालकीची उपकंपनी पूर्वी यूएईमधील विकफिल्ड इंटरनॅशनलचे शेअर्स होते, जे ‘डाबर’ने जून 2012 मध्ये विकले.

‘डाबर’ची संदेश ही बर्मन यांनी सुरू केलेली एक ना-नफा संस्था आहे ज्याचा उद्देश आरोग्य सेवा, शिक्षण आणि इतर सामाजिक-आर्थिक क्षेत्रात कल्याणकारी उपक्रम राबवणे आहे. ‘डाबर’ आपले कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रम संदेशच्या माध्यमातून चालवते.

‘डाबर रिसर्च फाउंडेशन’ ही औषध शोध आणि विकासामध्ये प्री-क्लिनिकल सेवा देणारी भारतीय संशोधन संस्था आहे. भारतातील सर्वात मोठी आयुर्वेदिक औषध उत्पादक कंपनी ‘डाबर’च्या संशोधन आणि विकास उपक्रमांचे नेतृत्व करण्यासाठी 1979 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली.

‘डाबर’ कंपनीचे मुख्यतः चार विभाग आहेत; आरोग्य सेवा, उत्पादने विभाग, कौटुंबिक उत्पादन विभाग आणि डाबर आयुर्वेदिक स्पेशालिटीज लिमिटेड.

कंपनीने कालांतराने बलसारा ग्रुप, फेम केअर फार्मा, हॉबी कॉस्मेटिक्स आणि अजंता फार्माच्या तीसहून अधिक ब्रॅण्ड्ससह इतर अनेक कंपन्या ताब्यात घेतल्या.

– चंद्रशेखर मराठे

The post प्रवास एका आयुर्वेदिक डॉक्टरने स्थापन केलेल्या बलाढ्य कंपनीचा… appeared first on स्मार्ट उद्योजक.

Leave a Comment